मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे राज्याचे संपूर्ण राजकारण तापले आहे. राज्यात एकीकडे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरची चर्चा असतानात दुरीकडे एटीएसनं मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी २ जणांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी त्या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र, चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. निलंबित पोलीस हवालदार विनायक शिंदे आणि बुकी नरेश धरे या दोघांना एटीएसनं अटक केली आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. या कारमुळे मनसुख हिरेन यांचं नाव या प्रकरणाशी जोडलं गेलं आणि त्यांचाच संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. सध्या जिलेटिन कांड्या प्रकरणाची चौकशी एनआयएकडून सुरू असून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएसकडून सुरू आहे. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत. मनसुख हिरेन यांची कार सचिन वाझे वापरत होते, असा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. सचिन वाझेंच्या निलंबनासोबतच या प्रकरणाच्या संबंधातच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करून त्यांना होम गार्डची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Comments
Loading…