मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख वादात सापडले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशमुख क्वारंटाईनमध्ये होते, असं सांगत राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली आहे. त्यानंतर भाजपाने देशमुखांच्या पत्रकार परिषदेवरून सवाल केला. या सगळ्या वादावर अनिल देशमुख यांनी सोशल मीडियावरून भूमिका मांडत नाराजी व्यक्त केली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख हे 15 फेब्रुवारी रोजी होम आयसोलेशनमध्ये होते असं म्हणता तर मग त्यांनी पत्रकार परिषद कशी घेतली? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केला होता. त्यावर अनिल देशमुख यांनी ट्विटरवरुन स्पष्टीकरण दिलं आहे.
“गेल्या काही दिवसांपासून काही लोकांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट मीडियातून चुकीच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे मी फार व्यथित झालो आहे. कोरोनाच्या एक वर्षाच्या काळात आमच्या पोलिसांचं मनोबल वाढवण्यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. नागपूरला 5 फेब्रुवारीला मी कोरोनाबाधित झालो. त्यानंतर 5 ते 15 फेब्रुवारी मी नागपूरच्या एलिक्झर रुग्णालयात दाखल होतो. 15 फेब्रुवारीला जेव्हा मला डिस्चार्ज मिळाला, तेव्हा होम क्वारंटाईनसाठी मी खासगी विमानाने नागपूरहून लगेच मुंबईला आलो” अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.
“होम क्वारंटाईन झाल्यानंतर मी लॉकडाऊनच्या सूचनेप्रमाणे रात्री उशिरा पार्कमध्ये प्राणायाम करण्यासाठी जात होतो. नागपूरमध्ये मी हॉस्पिटलला जाण्याच्या वेळेदरम्यान आणि मुंबईतील होम क्वारंटाईनच्या दरम्यान मी अनेकदा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका किंवा कार्यक्रमांमध्ये सहभागी झालो. होम क्वारंटाईननंतर 1 मार्चपासून आमचं अधिवेशन होतं. त्याच्या कामाला मी लागलो. त्या दरम्यान अधिवेशनासाठी आमची जी प्रश्नोत्तरं होती. लक्षवेधी सूचना होत्या, त्याच्या मीटिंगसाठी माझ्या शासकीय निवासस्थानी अनेक अधिकारी येत होते. त्यानंतर शासकीय कामासाठी पहिल्यांदा 28 फेब्रुवारीला घराच्या बाहेर पडलो. जनतेत चुकीची माहिती किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.” असं स्पष्टीकरण अनिल देशमुख यांनी दिलं आहे.
Comments
Loading…