राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची बैठक पार पडली. या बैठकीत राजेश टोपे यांनी महत्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत.
नागरिकांनी गर्दी टाळली आणि घालून दिलेल्या नियमांचं पालन केलं तर कोरोना रुग्णांची संख्या आपोआप कमी होईल. तेव्हा लॉकडाऊनची गरज तूर्तास तरी लागणार नाही. पण लोक स्वयंशिस्त पाळत नाहीत. त्यामुळे निर्बंध कडक करावे लागत आहेत. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असतो. जेव्हा सरकारच्या हातातील सर्व आयुधं संपतील. बेड्स उपलब्ध नसतील, अशावेळी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन शिवाय पर्याय उरत नाही. पण सध्या नागरिकांनी शिस्त पाळावी, गर्दी करु नये, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलंय.
राज्य सरकार सध्या ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंटवर भर देत आहे. अशावेळी कोरोनाची कुठलिही लक्षणं आढळल्यास कोरोना चाचणी करुन घेण्याचं आवाहन सरकारकडून केलं जातं. तसंच कोरोना रुग्णांच्या संपर्कातील लोकांनीही कोरोना चाचणी करुन घेण्याच्या सूचना केल्या जातात. पण राज्यात अनेक ठिकाणी कोरोना चाचणीसाठी गरीबांची मोठ्या प्रमाणात लूट सुरु आहे. गरीबांची होणारी ही लूट थांबवण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याची विनंतीही राजेश टोपे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
Comments
Loading…