देशभरात पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि केरळमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर टाइम्स नाऊ या संस्थेने केलेल्या एक्झिट पोल्समध्ये मतदारांचा कल जाणून घेण्यात आला आहे. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची सत्ता येणार असल्याचा अंदाज बांधण्यात आलाय. त्यामुळे ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पश्चिम बंगालच्या विधानसभेमध्ये एकणू २९४ जागा आहेत. त्यापैकी १५४ जागांवर ममतांच्या पक्षाला विजय मिळेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. २०१६ साली मिळालेल्या २११ जागांपेक्षा हा आकडा ५७ ने कमी आहे. भाजपाला २०१६ मध्ये पश्चिम बंगालमध्ये केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र भाजपाला १०७ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपाची ताकद वाढणार आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांना बंगालमध्ये केवळ ३३ जागा मिळतील असं या सर्वेक्षणामध्ये म्हटलं आहे.
याव्यतिरिक्त आसाममध्ये पुन्हा कमळ फुलणार असल्याची चर्चा आहे. ईशान्येकडील दरवाजा असलेल्या आसाम राज्यात भाजपाने मागील निवडणुकीत मुसंडी मारली होती. सर्वनंदा सोनोवाल यांना मुख्यमंत्री करत भाजपाने राजकीय समीकरण जुळवून आणले होते. आसाम गण परिषदेला सोबत घेऊन तसेच बोडोलँड पीपल्स फ्रंट सोबत सूत जूळवून भाजपाने सत्ता मिळवली. या ठिकाणी भाजपाला पुन्हा एकदा यश मिळणार असल्याचे दिसते.
दक्षिणेत केरळ आणि तामिळनाडूत भाजपाला पुन्हा सत्तेपासून वंचित राहावं लागणार आहे. तामिळनाडूमध्ये डीएमके आणि काँग्रेसच्या युतीची थेट लढाई एआयएडीएमके आणि भाजपाच्या युतीशी होणार आहे. डीएमके आणि काँग्रेसला २३४ पैकी डीएमकेला १५८ जागा मिळत असं सांगितलं जात आहे.
तर केरळमध्ये केरळमध्ये मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफला पुन्हा एकदा सत्ता मिळेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. १४० सदस्यांच्या विधानसभेमध्ये ८२ जागांवर एलडीएफचा विजय होईल असा अंदाज आहे. काँग्रेस आणि युडीएफला केरळमध्ये ५६ जागांवर विजय मिळेल असं या सर्वेक्षणामधून दिसत आहे.
Comments
Loading…